Leak: टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे त्या म्हणाल्या. शिक्षक भरती परीक्षा झाल्यानंतर रिचेकिंगवेळी गैरप्रकार होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून ८८ लाख रुपयांची रोख ताब्यात घेण्यात आली आहे. उमेदवारांकडून ३५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले जात होते. आतापर्यंत जवळपास साडेचार कोटी रुपये गोळा झाले होते असा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी कायदेशीर कार्यवाहीसंदर्भात शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. जो कुणी दोषी आढळेल त्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असे त्यांनी सांगितले. आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ जाहीर करुन त्यांनी ही माहिती दिली. कसा व्हायचा गैरव्यवहार? 'परीक्षेच्या वेळी उमेदवारांना सांगितलं जायचं की तुम्ही ओएमआर शीट्स भरू नका आणि स्कॅनिंगच्या वेळी त्यांची ओएमआर शीट भरली जायची. यातही काही उमेदवार राहिले असतील तर त्यांना सांगायचे की तुम्ही रिचेकिंगसाठी अप्लाय करा आणि त्यांचा रिचेकिंगचा अर्ज आला की त्यांच्या पेपरमध्ये गैरप्रकार केला जायचा. या उमेदवारांसाठी पूर्व परीक्षेसाठी ३५ हजार ते १ लाख रुपये घेतले जायचे असा प्राथमिक अंदाज आहे. मुख्य परीक्षेत पुढे रेट आणखी वाढायचा,' अशी माहिती गुप्ता यांनी दिली. हा टीईटी परीक्षा गैरव्यवहार २०२० च्या जानेवारीत झालेल्या टीईटी परीक्षेच्या वेळचा आहे. आणखी कोणकोणत्या परीक्षांच्या वेळी गैरव्यवहार झाला त्याचा पोलीस तपास करत आहेत. म्हाडा परीक्षा होणार होती त्याच्या आदल्या दिवशी पेपर फुटी होणार असल्याच्या संशयावरून पोलिसांनी जे छापे घातले आणि तपास केला त्यात टीईटी परीक्षेसंदर्भातल्या गैरव्यवहाराचे धागेदोरे पुढे आले आहेत. दरम्यान, पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अटक केली. आरोग्य विभागाच्या पेपरफुटीचा तपास करीत असताना सायबर पोलिसांना म्हाडाच्या पेपरबाबतची माहिती मिळाली. म्हाडा परीक्षेचा पेपर फुटताना जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डा. प्रीतीश देशमुख व अन्य दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली. देशमुख यांच्या घरझडतीत टीईटीच्या परीक्षार्थींचे हॉल तिकीट सापडले होते. त्याचवेळी टीईटीचा पेपर फुटल्याचा संशय वाढला होता. त्यानंतर गुरुवारी सायबर पोलिसांनी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पिंपरीतील त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे दिवसभर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mbahu0

Comments
Post a Comment