टीम मटापुणे/ठाणे/मुंबई आरोग्य विभागापाठोपाठ आता महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या संवर्गातील परीक्षेचे पेपरही फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुणे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. आरोग्य विभागाचा पेपर फोडल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या आरोपींच्या तपासामध्ये ‘म्हाडा’चाही पेपर फोडण्यात आल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. त्यानुसार शनिवारी औरंगाबादमध्ये झालेल्या कारवाईदरम्यान तिघांना गजाआड केले आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पेपर फुटला नाही, तर परीक्षेआधीच गोपनीयतेचा भंग झाला होता, असे स्पष्टीकरण गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दिले. यापुढे म्हाडा स्वत: प्रश्नपत्रिका तयार करेल, असेही यावेळी आव्हाड यांनी सांगितले. ‘म्हाडा’च्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या संवर्गातील नोकरभरतीची परीक्षा घेण्याचे कंत्राट जी. ए. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळाले होते. या पेपरफुटीमध्ये याच कंपनीच्या संचालकाचा समावेश असल्याचे उघड झाले असून त्यालाही गजाआड करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस दलाचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातील लॅपटॉप आणि पेनड्राइव्हमध्ये या पेपरचे सेट आढळल्याचे आयुक्तांनी सांगितले. डॉ. प्रीतिश दिलीप देशमुख (३२, रा. महिंद्र अॅन्थिया, खराळवाडी, पिंपरी-चिंचवड), अंकुश राजाभाऊ हरकळ (४४) आणि संतोष लक्ष्मण हरकळ (४२, दोघेही रा. चिखलठाणा, औरंगाबाद) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. डॉ. देशमुख हा जी. ए. सॉफ्टवेअर प्रा. लि. कंपनीचा संचालक आहे. याप्रकरणी ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन संपतराव माने यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या कंपनीला ‘म्हाडा’च्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या संवर्गातील १२, १५, १९ आणि २० डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे कंत्राट मिळाले होते. कंपनीचा संचालक असलेल्या डॉ. देशमुख याने गोपनीयतेचा भंग करून ‘म्हाडा’च्या परीक्षेचे पेपर स्वतःकडे बाळगल्याचे आढळले आहे. या प्रकरणात वेगवेगळ्या ठिकाणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे हेसुद्धा पत्रकार परिषदेस उपस्थित होते. रविवारी सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार; तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता पदाची होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. ही परीक्षा जानेवारी महिन्यात होईल, असेही त्यांनी सांगितले. सकाळच्या सत्रात ५० हजार, तर दुपारच्या सत्रात ५६ हजार उमेदवार परीक्षा देणार होते. पेपरफुटीचा प्रकार उघड झाल्यानंतर म्हाडाची रविवारी व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलण्य़ात आली. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. मात्र त्यानंतर भाजपने आव्हाड आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले, तसेच राज्यातील विद्यार्थ्यांनीही नाराजी व्यक्त केली. या सर्व पार्श्वभूमीवर दुपारी पत्रकार परिषद घेत आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘पेपर फोडण्याआधीच पोलिसांनी पेपरफुटीतील टोळीला पकडले. म्हाडाच्या पेपरसंदर्भात फक्त एकाच व्यक्तीला माहिती होती, तरीही पेपर कसा फुटला? म्हाडाच्या परीक्षेआधीच गोपनीयतेचा भंग झाला. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. योग्य ती कारवाई करण्यात येईल.’ आता म्हाडाच स्वतः परीक्षा घेणार आहे. संपूर्ण परीक्षेची जबाबदारी म्हाडा घेणार आहे. तसेच परीक्षार्थींकडून घेतलेले शुल्क परत करण्यात येणार असून आगामी परीक्षेचे शुल्क आकारण्यात येणार नाही, अशी माहिती आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. आव्हाड म्हणाले की, प्रश्नपत्रिकेबाबत एकाच व्यक्तीला माहिती होती. प्रश्नपत्रिका छपाईला गेल्यावर संबंधित कंपनीने त्या प्रश्नपत्रिका आपल्या ताब्यात ठेऊ नयेत, असे स्पष्ट निकष असतानाही या कंपनीच्या मालकाने सदर प्रश्नपत्रिका आपल्या ताब्यात ठेवली. त्याने गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परीक्षेत काही गैरप्रकार होणार असल्याचा संशय आपणाला या आधीच आला होता. त्यामुळेच आपण तीन दिवसांपूर्वीच गैरप्रकार आढळल्यास परीक्षा रद्द करण्याचा इशारा दिला होता. पेपर फोडणाऱ्या काही टोळ्या सध्या कार्यान्वित आहेत. त्या उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. म्हाडा आणि पोलिसांनी एकत्रितपणे ती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे पेपर फुटण्याच्या आधीच परीक्षा रद्द करण्यात आली. पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असता तर नक्कीच ती नामुष्की ठरली असती. शिवाय, अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींसाठी अन्यायकारक ठरले असते. वशिल्याचे तट्टू म्हाडामध्ये जाण्यापासून रोखण्याचे काम केले, असेही आव्हाड म्हणाले. ‘वास्तविक पाहता, यामध्ये मी मध्यस्थी करण्याची गरज नव्हती. पण, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमापोटी आक्रमक भूमिका घेतली. दोन दिवसांपूर्वी याच कंपनीने पुणे पोलिस दलाची परीक्षा घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास तरी कसा दाखवणार?’ असा सवाल आव्हाड यांनी केला. ही परीक्षा रद्द करून, वशिल्याचे तट्टू बाजूला सारून हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षताही म्हाडा आणि पोलिसांनी घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले. पेपर विकण्याचा प्रयत्न? आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या पदांच्या परीक्षांच्या पेपरफुटीचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे. या तपासादरम्यान ‘म्हाडा’च्या परीक्षेचा पेपर फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. त्यानुसार औरंगाबाद, जालना, बीड, पुणे आणि ठाणे परिसरातून पुणे पोलिसांच्या पथकांनी संशयितांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. औरंगाबाद येथील तिघांकडून म्हाडाचा पेपर फुटणार असल्याची ठोस माहिती मिळाली होती. तर, पुणे परिसरात संतोष हरकळ व अंकुश हरकळ ‘म्हाडा’चा पेपर उपलब्ध करून देणार असल्याचे समजले. पुणे पोलिसांनी या दोघांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार पळसुले, निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या पथकाने त्यांना विश्रांतवाडी येथे मोटारीतून ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ. देशमुख हासुद्धा सापडला. त्याच्याकडील झडतीमध्ये लॅपटॉप आणि पेपरचे नऊ सेट सापडले. एका लिफाफ्यामध्ये पेनड्राइव्ह मिळाला असून त्यामध्ये पेपरचे इतर सेट होते. पेपरसाठी आले विद्यार्थ्यांचे फोन आरोपी संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांच्या झडतीमध्ये त्यांच्याकडे मोबाइल सापडले. त्या मोबाइलची पाहणी केली असता ‘म्हाडा’च्या लेखी परीक्षेसंदर्भात संशयास्पद संभाषण झाल्याचे आढळले आहे. तसेच, दोघांना अटक केल्यानंतरही काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या फोनवर संपर्क करून प्रश्नपत्रिका कोठे व कधी मिळणार याची चौकशी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yiDW9A

Comments
Post a Comment