म. टा. प्रतिनिधी | औरंगाबाद महापालिका हद्दीतील प्राथमिक शाळांमध्ये २१ महिन्यांनंतर बच्चे कंपनीचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. शहरातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज असून, अनेक शाळांनी वर्ग खोल्यांची रंगरंगोटी केली आहे. करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, रविवारी अनेक शाळांमध्ये साफसफाई, वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू होते. शाळा आठवड्यातील पाच दिवसच असणार आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील प्राथमिक स्तरावरील शाळा दीड वर्षापासून बंद होत्या. मार्च २०२०पासून बंद असलेल्या शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्याचा राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानुसार ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या. मात्र, करोनाच्या नव्या विषाणूचा धोका लक्षात घेता शहरातील शाळांमधील प्राथमिक वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय लांबला होता. याविषयीचा निर्णय १० डिसेंबरनंतर घेतला जाईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले होते. त्यानंतर प्रशासनाने २० डिसेंबरपासून शहरातली पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली. शाळा अनेक महिन्यांनंतर सुरू होत असल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये उत्सुकता आहे. शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी केली केली आहे. वर्ग खोल्यांच्या रंगरंगोटीमुळे शाळांचे रुपडे पालटले आहे. वर्ग खोल्यांची स्वच्छता, साफसफाई करण्याचे काम शाळांमध्ये सुरू होते. वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यावरही शाळा व्यवस्थापनाचा भर होता. करोना पार्श्वभूमिवर शाळांनी काय खबरदारी घ्यावी याबाबत शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांची बैठक घेत सूचना केल्या आहेत. करोना प्रतिबंधक नियम पाळून वर्ग भरविण्याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. शाळा या सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील, शनिवार व रविवारी शाळा बंद राहणार आहेत. शहरात पहिली ते सातवीपर्यंतची शाळा संख्या ७४६ आहे. यामध्ये महापालिकेच्या ७१ शाळा आहेत. शहरातील शाळांमध्ये दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षकांच्या लसीकरण शंभर टक्के झाल्याचे सांगण्यात येते. महापालिकेतील सर्व ४३७ शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे महापालिका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शाळांसाठी सूचना - शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण - गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळा परिसरात प्रवेश न देणे - एका बाकावर एक विद्यार्थी; दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर - मास्कचा वापर, हँडवॉशसाठीची व्यवस्था - करोनाबाधित विद्यार्थी आढळल्यास शाळा बंद करून निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थ्यांचे विलगीकरण - शाळा सुरू करताना टप्प्या-टप्प्यात मुलांना बोलाविणे - शिक्षकांची आरटी-पीसीआर करणे - विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून लेखी संमती घेणे - ऑनलाइन, ऑफलाइन, दूरस्थ शिक्षण पूर्वी प्रमाणे सुरू ठेवावे - मध्यांतराची सुटी न देता वर्गातच सुरक्षित अंतर ठेवून जेवणाची व्यवस्था करणे महत्वाची आकडेवारी शहरातील पहिली ते सातवीपर्यंत शाळा- ७४६ पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी- २,००,९९७ कार्यरत शिक्षक- ८,५१० महापालिका शाळा संख्या- ७१ महापालिका शाळेतील विद्यार्थी संख्या-१०,९१५ महापालिका शाळेतील शिक्षक संख्या- ४३७ शाळा सुरू होत असल्याने शहरातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेत शिक्षण विभाग, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांबाबत माहिती दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर, शाळांना नियमांचे पालन करावे लागणार आहे. शाळा स्वच्छता, निर्जंतुकीकरण, आसनव्यवस्था, पिण्याचे पाणी, हँडवॉश स्टेशनबाबत शाळांना खबरदारी घ्यावी लागणार असल्याचे औरंगाबाद महापालिकेचे प्रभारी शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32cbYAL

Comments
Post a Comment