म. टा. प्रतिनिधी, पुणे 'दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांसाठी वगळण्यात आलेल्या २५ टक्के अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती विद्यार्थी आणि पालकांना शाळांकडून देण्यात यावी,' अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे. विद्यार्थी आणि पालकांना ही माहिती मिळाल्यास परीक्षेची तयारी करण्यासाठी सोपे जाईल, असे पालकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते बारावीच्या सध्याच्या अभ्यासक्रमातून २५ टक्के अभ्यासक्रम वगळला. उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमांच्या आधारेच परीक्षा घेतल्या जाव्यात, असे राज्याच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष २०२१ मध्येही हाच निर्णय कायम ठेवत याही वर्षी अभ्यासक्रमामध्ये कपात करण्यात आली. www.maa.ac.in या वेबसाइटवर वगळलेल्या अभ्यासक्रमाची माहिती देण्यात आली आहे. २०२१-२२ या वर्षात होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा वगळलेल्या अभ्यासक्रमाला लक्षात घेऊनच होणार आहेत. वगळलेल्या अभ्यासक्रमातील एकही प्रश्न विचारला जाणार नाही, याबाबत सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी सविस्तर माहिती घेऊन त्यानुसार परीक्षेची तयारी करणे गरजेचे आहे. इयत्ता नववी व दहावीच्या वगळलेल्या अभ्यासक्रमाची १४८ पानांची, तर गणिताच्या पुन्हा वगळलेल्या काही भागाची पुरवणी यादी १३ पानांची आहे. इयत्ता अकरावी-बारावीसाठी वगळलेल्या अभ्यासक्रमाची ३४८ पानांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय अन्य काही श्रेणी विषय; तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असणारे विषय यांच्यासाठीही स्वतंत्र वगळलेल्या भागाची माहिती विद्या प्राधिकरणाच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परंतु, विद्यार्थी आणि पालकांच्या सोयीने शाळांनी विषयांनुसार वगळलेल्या अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थी आणि पालकांना द्यावी, अशी मागणी होत आहे. --------------- वगळलेल्या अभ्यासक्रमाची माहिती सर्व शाळा महाविद्यालयांनी स्वतः काळजीपूर्वक माहित करून घेणे आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे गरजेचे आहे. यामुळे परीक्षेला सामोरे जाताना परिपूर्ण तयारी करणे शक्य होईल. - महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ ------------------- दहावीच्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची माहिती देणे गरजेचे आहे. वगळण्यात आलेल्या अभ्यासक्रमात पूर्ण प्रकरणे न वगळता त्यातील काही भाग वगळण्यात आला आहे. अशाने अनेकदा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना वगळलेला अभ्यासक्रम समजावून सांगणे गरजेचे आहे. - संजय गरूड, पालक -----------------
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3H7qdpl

Comments
Post a Comment