पुणे : प्राथमिक शाळा सुरू होऊन एक दिवसही होत नाही तोच पुण्यातील अनेक शाळांमधील शिक्षकांवर निवडणुकांची कामे सोपविण्यात आली आहेत. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आता कुठे विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना शिक्षकांना घरोघरी जाऊन मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण करावे लागणार असल्याने दीड वर्षांनंतर शाळा, महाविद्यालयांमध्ये आलेल्या मुलांना शिकवायचे की निवडणुकीची कामे करायची, असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्राथमिक शाळा गुरुवारपासून सुरू झाल्या. यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या कनिष्ठ महाविद्यालये आणि माध्यमिक शाळांमध्ये गेल्या आठवड्यापासून विद्यार्थी संख्या वाढू लागली आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये पूर्वपदावर येत असताना अनुदानित, शासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकांना निवडणूकपूर्व कामे लावण्यात आली आहेत. मतदारनोंदणी अधिकाऱ्यांनी विधानसभा मतदार संघानुसार शाळांची कामे लावलेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार शुक्रवारपासून (१७ डिसेंबर) शहरातील शेकडो शिक्षकांना निवडणुकांची कामे करावी लागणार आहेत. शहरातील विधानसभा मतदारसंघांमधील परिसरात नागरिकांच्या घरोघरी जाऊन मतदारयाद्यांचा आढावा घेऊन त्याचे पुनर्निरीक्षण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर देण्यात आली आहे. मतदारनोंदणी अधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकात शिक्षकांनी शिकवण्याच्या वेळा सांभाळून निवडणुकांचे काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, शाळांची वेळ आणि सरकारी कार्यालयांची वेळ सारखीच असल्याने अनेक शिक्षकांना वर्ग सोडून निवडणुकीच्या कामासाठी पळावे लागणार आहे. शाळांची जबाबदारी निम्म्या शिक्षकांवर शहरातील अनेक सरकारी; तसेच अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अत्यल्प आहे. अशा शाळांच्या अर्ध्याहून जास्त शिक्षकांना निवडणुकीची कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याने या शाळांची भिस्त केवळ दोन ते तीन शिक्षकांवर असणार आहे. दीड वर्षांनी सुरू होत असलेल्या शाळांमध्ये इतक्या कमी संख्येचे अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार, असाही प्रश्न या निमित्ताने उद्भवला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका शिक्षकांना निवडणूकपूर्व कामे करण्यासाठी मतदारसंघामध्ये घरोघरी जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत शहरातील शिक्षक वेगवेगळ्या भागांमध्ये, वस्त्यांमध्ये फिरणार आहेत. हेच शिक्षक दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेत जाणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेमुळे एखाद्या शिक्षकाला बाधा झाली आणि त्यामुळे शाळेमध्ये करोनाचा प्रसार झाला तर काय करायचे, याचे उत्तर अद्याप निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले नाही. शाळा सुरू करत असताना सरकारने शिक्षकांच्या मूळ कामात कोणताही व्यत्यय आणू नये. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे ही शिक्षकांची प्राथमिक जबाबदारी आहे. दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्या असल्याने त्याकडे शिक्षक लक्ष देत आहेत, अशा वेळेला सरकारने त्यांना निवडणुकांचे काम लावणे हे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यासारखे आहे. या निर्णयाचा आम्ही कठोर विरोध करणार आहोत. - हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. शहरातील शिक्षणाची परिस्थिती हळूहळू रुळावर येत असताना शाळांमध्ये अध्यापन करण्याऐवजी शिक्षकांना निवडणुकांच्या कामासाठी लावणे, ही खेदजनक गोष्ट आहे. राजकारण महत्त्वाचे की शिक्षण, हे सरकारने एकदा ठरवायला हवे. - शिवाजी कामठे, अध्यक्ष, पुरोगामी शिक्षक लोकशाही आघाडी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3F6wp0e

Comments
Post a Comment