म. टा. प्रतिनिधी, मुंबई राज्यात सुरू असलेल्या एसटीच्या संपाला ५० दिवस पूर्ण होऊनही संपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच राज्यात शाळा सुरू झाल्याने १२ लाख विद्यार्थी शाळा गाठण्यासाठी एसटीच्या प्रतीक्षेत आहेत. एसटीची सेवा सुरू नसल्याने अनेक विद्यार्थ्यांवर शाळेला दांडी मारण्याची वेळ आली असून, काही विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी लटकून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांना प्रवासात सवलत आहे. गाव-खेड्यातील वस्तीपासून तालुक्याच्या ठिकाणापर्यंत एसटी धावते. यामुळे राज्यात विद्यार्थ्यांसाठी एसटी ही शिक्षणवाहिनी म्हणूनही ओळखली जाते. एसटी महामंडळाच्या सर्व बसमध्ये विद्यार्थ्यांना सवलत आहे. महामंडळातील एकूण प्रवासी संख्येपैकी सुमारे १२ लाख प्रवासी हे विद्यार्थी आहेत. अनेक बस शाळेच्या वेळेनुसार धावत असल्याने लाखो विद्यार्थी एसटीवर अवलंबून असतात. संपामुळे एसटी वाहतूक बंद आहे. सध्या काही मार्गावर एसटी धावत असली तरी तेथे मर्यादित फेऱ्या होत आहेत. यामुळे ही सेवा असून नसल्यासारखीच आहे. स्वस्त आणि विश्वासार्ह वाहतुकीची सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना नाईलाजाने शाळेला दांडी मारावी लागत आहे. एसटी कामगारानी २७ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी उपोषणाची हाक देत काम बंद आंदोलन केले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांनी अघोषित संप पुकारला होता. संपकरी कर्मचारी हे 'महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे,' या मागणीवर ठाम असल्याने एसटी संप सुरूच आहे. महामंडळाकडून कारवाई एसटी संपात सहभागी झालेल्या आणखी ११ कर्मचाऱ्यांवर गुरुवारी महामंडळाने बडतर्फीची कारवाई केली. यामुळे बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांची संख्या २२ झाली आहे. एकूण २९२ निलंबित एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची नोटीस बजावण्यात आलेली आहे. संपकाळात एकूण २,७६४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून एकूण १०,६५० कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. रोजंदार म्हणून काम करणाऱ्या २०५५ कामगारांची सेवा समाप्त करण्यात आलेली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3q3pCy6

Comments
Post a Comment