म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी निकालापूर्वीच व्हायरल झाल्याने गुरुवारी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होण्यास सुरुवात झाली. मात्र ही यादी अधिकृत नसल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले. राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यंदा १२ ऑगस्ट रोजी पाचवीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी गुरुवारी दिवसभर व्हायरल झाली. या यादीच्या आधारे विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचे तसेच, शाळांचे आभार मानणारे फोनही सुरू झाले. मात्र शाळांच्या मुख्याध्यापकांनी सावध पवित्रा घेत अद्याप आमच्याकडे अशी कोणीतीही यादी आली नसल्याचे सांगत पालकांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. राज्य परीक्षा परिषदेने वेबसाइटवर अद्याप अधिकृत निकाल जाहीर झाला नसल्याचे दुपारी स्पष्ट केले. मग ही यादी व्हायरल कुठून झाली असा प्रश्न उपस्थित झाला. या परीक्षेचा तात्पुरता निकाल २४ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला होता. यावर हरकत नोंदविण्याची मुदत संपल्यानंतर आता अंतिम निकालाची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे पेपरफुटीनंतर आता निकालही फुटू लागल्याची चर्चा दिवसभर सोशल मीडियावर रंगली होती. निकाल सोमवारी किंवा मंगळवारी ही यादी आम्ही प्रसिद्ध केलेली नाही, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले. निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून सोमवारी किंवा मंगळवारी निकाल जाहीर होईल. ही यादी अधिकृत नसून पालक, विद्यार्थी, शाळांनी यावर विश्वास ठेवू नये, असेही ते म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32M04NW

Comments
Post a Comment