म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई राज्य सरकारच्या विविध विभांगाच्या परीक्षा घेण्यासाठी तीन संस्थांची नेमणूक करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. विविध पदांसाठीच्या या परीक्षा आता महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एमकेसीएल (), इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल () तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस () या संस्थांमार्फत घेण्याच्या निर्णयास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील विविध पदांसाठी झालेल्या परीक्षेत अनेकवेळा गोंधळ उडाला होता. तर म्हाडातील रिक्त जागांसाठी घेतलेल्या परीक्षेतही त्याचीच पुनरावृत्ती झाली. पेपरफुटी, व्यवस्थापन गोंधळ, परीक्षा केंद्रांचा घोळ तसेच प्रश्नपत्रिकांतील चुकांमुळे गेल्या वर्षभरापासून उमेदवारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या परीक्षा रद्द करण्याची नामुष्कीही राज्य सरकारवर वारंवार ओढवत आहे. याप्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली होती. तसेच राज्यभर उमेदवारांनी आंदोलनेही केली होती. या प्रश्नाचे पडसाद बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले व भरती परीक्षांबाबतच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध शासकीय विभागांमार्फत होणाऱ्या परीक्षा यापुढील काळात एमकेसीएल, आयबीपीएस तसेच टीसीएस या संस्थांच्या माध्यमातूनच घेण्यात याव्यात, असा निर्णय झाला. या संस्था घेणार परीक्षा - महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड - इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल - टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रत्येक जिल्ह्यांत पुस्तकांचे गाव वाचन संस्कृती आणि ग्रंथ प्रसार चळवळीस हातभार लावण्यासाठी पुस्तकांचे गाव भिलारच्या धर्तीवर आता प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचे गाव साकारण्यात येणार आहे. मराठी भाषा विभागाच्या या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ही योजना राज्य मराठी विकास संस्थेच्या स्तरावर स्वतंत्रपणे उपक्रम म्हणून राबविण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव व्हावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3maOQcB

Comments
Post a Comment