म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा होऊन अडीच वर्षे झाले असून यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मैदानी चाचणीची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारामुळे मराठवाडा आणि विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना इतर संधीवरही पाणी सोडावे लागते आहे. शारीरिक चाचणीच्या दृष्टीकोनातून तयारी करणाऱ्यांपैकी अनेक जणांना खर्च परवडत नाही तर काहींना दुखापत झाली. वेळ आणि पैसा खर्च होते आहे. त्यात आता ओमायक्रॉनमुळे लॉगडाउनची चर्चा असल्याने प्रक्रिया पुन्हा लांबणार का, या भीतीने विद्यार्थी चिंतेत आहेत. एमपीएससीने २०१८मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाची जाहिरात काढली. ४९६ पदांसाठी आयोगाकडून प्रक्रिया करण्यात येत आहे. पदभरतीची प्रक्रिया २०१८मध्ये सुरू झाली. २०२२ नवीन वर्ष सुरू होत आहे. मात्र, प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. चार-चार वर्षे एका परीक्षेसाठी लागत असतील तर, इतर परीक्षांची तयारी कशी करणार असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. मुख्य परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी होणे बाकी आहे, परंतु आयोगाने अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मराठवाडा, विदर्भासाठीचे वेळापत्रक स्वतंत्र असणार आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. मैदानी चाचणी परीक्षेच्या अनुषंगाने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा पंधरा हजारपेक्षा अधिक खर्च येत आहे. अनेक विद्यार्थी मैदानी चाचणी परीक्षेसाठी प्रशिक्षकाची मदत घेतात. त्यासह कवायत, आहार याबाबींसाठी वाढता खर्च अनेकांना आर्थिक अडचणीचा ठरतो आहे. बहुतांशी विद्यार्थी ग्रामीण भागातील, अनेकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यात अद्याप चाचणी कधी होणार हे ही निश्चित नाही. त्याचे वेळापत्रक जाहीर करायलाही आयोगाला वेळ मिळालेला नाही. त्यात आता ओमायक्रॉनची चर्चा सुरू आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाउन लागते की काय, त्यामुळे पुन्हा मैदानी चाचणी व मुलाखत प्रक्रियेचे वेळापत्रकही लांबणीवर पडेल का ही चिंताही विद्यार्थ्यांना सतावते आहे. विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी व मुलाखत प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी आयोगाकडे केली आहे. ... अर्धवट प्रक्रिया आयोगाने मैदानी चाचणीमध्ये सुमारे आठशे मुलांची प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांसाठीही होणारी प्रक्रिया अपूर्ण आहे. अर्धवट प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याने पुढील प्रक्रियाही लांबतील. दोन्ही विभागातील अशा उमेदवारांची संख्या बाराशेपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येते. अशावेळी इतर परीक्षांचा अभ्यासावरही लक्ष केंद्रीत करता येत नसल्याचे उमेवारांनी सांगितले. महत्त्वाच्या तारखा........ आयोगाची जाहिरात डिसेंबर २०१८ पूर्व परीक्षा २४ मार्च २०१९ मुख्य परीक्षा ४ ऑगस्ट २०१९ मुख्य परीक्षेचा निकाल २ मार्च २०२० .. गेल्या २८ महिन्यांपासून सतत सराव करून शारीरिक, आर्थिक आणि मानसिक ताण प्रचंड वाढलेला आहे. घरचे सतत फिजिकल कधी होणार याची विचारणा करत आहे. परंतु आयोगाकडून अजूनही कुठलीही तारीख जाहीर करन्यात आलेली नाही. आयोगाने आमचा प्राधान्याने विचार करावा आणि लवकर उर्वरित तारखा जाहीर कराव्या हीच अपेक्षा आहे. शुभम जाधव ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव आणि फिजिकल कधी होणार याबद्दल असलेली अस्पष्टता यामुळे प्रचंड मानसिक ताण येत आहे. तसेच येणाऱ्या काळात आयोगाच्या इतर ही परीक्षा होणार आहे, त्याचा अभ्यास करण्यात अडचण निर्माण होत आहे. पर्यायाने पुढील संधीवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. -आनंद चव्हाण
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3JjyEQb

Comments
Post a Comment