म. टा. प्रतिनिधी, पुणे 'शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालात बेकायदा गुण वाढवून पात्र होणाऱ्या सात हजार ८०० उमेदवारांपैकी काही उमेदवार शिक्षक असल्यास, त्यांची सेवा तत्काळ समाप्त करण्याचे आदेश देण्यात येतील,' अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त हरून आतार यांनी शनिवारी दिली. या गैरप्रकारातील अनेक जण शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने, त्यांच्यावर नोकरी गमावण्याची वेळ येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९मध्ये परीक्षा घेतली होती. या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थींना पात्र केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात पुणे सायबर पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील सात हजार ८०० परीक्षार्थी अपात्र होते. मात्र, शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन अधिकारी आणि खासगी एजंट यांनी संगनमत करून, अपात्र उमेदवारांकडून पैसे घेतले. त्यानंतर त्यांना निकालामध्ये उत्तीर्ण करून, शिक्षक पदासाठी पात्र ठरविण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार अशा उमेदवारांची संख्या सात हजार ८०० आहे. त्यामुळे या उमेदवारांवर काय कारवाई करण्यात येईल, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याबाबत आतार म्हणाले, 'टीईटी परीक्षा बेकायदा पद्धतीने उत्तीर्ण होणाऱ्या सात हजार ८०० उमेदवारांची यादी प्राप्त झाल्यावर, ती जिल्हानिहाय राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. यातील काही उमेदवार शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असल्यास, त्यांची सेवा तत्काळ संपविण्याची कारवाई सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे उर्वरित उमेदवारांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. या संपूर्ण प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही.' नोकरी जाईल म्हणून... शिक्षक भरती बंद असतानाही २०१२नंतर शालेय शिक्षण विभागातील अधिकारी आणि संस्थाचालक यांनी संगनमत करून शेकडो बोगस शिक्षकांची भरती केली. दरम्यान, डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशनने शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या परंतु टीईटी अपात्र असणाऱ्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने ३० मार्च २०१९ ही टीईटी उत्तीर्ण होण्याची अंतिम मुदत दिली होती. मात्र, मुदतीत टीईटी उत्तीर्ण न झाल्यास नोकरी जाईल, या धास्तीमुळे या अपात्र शिक्षकांनी टीईटी पात्र होण्यासाठी पैसे दिल्याची शक्यता आहे. आता सात हजार ८०० उमेदवार हे पैसे देऊन पात्र झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यापैकी निम्म्यापेक्षा अधिक शिक्षक कार्यरत असल्याची शक्यता असोसिएशनचे संतोष मगर यांनी व्यक्त केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/76RjCr1JU
Comments
Post a Comment