औरंगाबाद: मार्च-एप्रिलमध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा होणार आहे. त्यामुळे या परीक्षेच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. १५) शहरातील देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन, माध्यमांच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांची आढावा बैठक शिक्षण विभागातर्फे घेण्यात आली. यावेळी परीक्षार्थीला खाली बसविल्याचे आढळल्यास संबंधित शाळेकडून एक लाखांचे दंड वसूल केले जाणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाकडून देण्यात आला. यावेळी बैठकीत शिक्षण विभागाकडून दिलेल्या सुचनेनुसार, दहावी, बारावीच्या केंद्र उपकेंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सुरळीत असावी. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवावा. परीक्षा काळात ज्या केंद्रावर विद्यार्थी खाली बसून पेपर देताना आढळून येईल. त्या शाळा, विद्यालय केंद्राकडून एक लाख रुपये दंड वसूल करून मंडळ मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी शिक्षण विभागाकडून देण्यात आला. तसेच मार्च-एप्रिलमध्ये उष्णता वाढलेली असते,त्यामुळे या काळात विद्यार्थ्यांना त्रास होऊ नयेत म्हणून परीक्षा हॉलमध्ये लाईट फॅन सुरू असावा यासाठी महावितरण अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. त्याचबरोबर अतिदुर्गम अथवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेला उशीर होऊ नये किंवा प्रवासात कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी 'हात दाखवा, गाडी थांबवा' यासाठी एसटी महामंडळाला देखील पत्र देण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आले. परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी..... एकीकडे शिक्षण विभागाकडून दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याची तयारी झाली असताना, दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून मात्र परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यासाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुद्धा करण्यात आले होते. मात्र परीक्षा ऑनलाइनच होणार यावर प्रशासन ठाम आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cPA3qCl

Comments
Post a Comment