म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अखेर १६ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली. यानंतर राज्यभरात जवळपास १ लाख ८१ हजार ६१९ जागा रिक्त राहिल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक जागा मुंबई विभागात रिक्त राहिल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा लहान कॉलेजांमधील जागांबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या महानगर क्षेत्रात अकरावी प्रवेशासाठी यंदा पाच लाख ५९ हजार १९५ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी चार लाख ४८ हजार ६४४ विद्यार्थ्यांनी या प्रवेशासाठी अर्ज केले होते. प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी शिक्षण संचालनालयाने तब्बल तीन महत्त्वाच्या प्रवेश फेरी आणि त्यानंतर दोन विशेष प्रवेश फेरी आयोजित केल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ही फेरी आयोजित करून विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या कॉलेजातील रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर राज्यात तीन लाख ७७ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यानंतरही राज्यभरातील कॉलेजांमध्ये तब्बल एक लाख ८१ हजार ६१९ जागा रिक्त राहिल्या आहेत. मुंबईत सर्वाधिक रिक्त जागा यंदा मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे ८०० ज्युनिअर कॉलेजांत ३ लाख २० हजार ७५० इतकी प्रवेश क्षमता होती. या जागांवर १ लाख ७३ हजार ८८१ प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात आले. तर, कोट्यातील ४९ हजार ७७० प्रवेश देण्यात आले. असे मिळून २ लाख २३ हजार ६५१ प्रवेश पूर्ण झाले, तर शिल्लक जागा ९७ हजार ९९ इतक्या राहिल्या आहेत. यामध्ये शाखानिहाय सर्वाधिक रिक्त जागा वाणिज्य शाखेच्या ४३ हजार ५५२, विज्ञान शाखेच्या ३५ हजार ७४३ आणि कला शाखेच्या १५ हजार १८६ जागा रिकाम्या राहिल्या आहेत. ऑनलाइनमधील ७७ हजार २१२, कोट्यातील १९ हजार ८८७ जागा रिक्त आहेत. इनहाउस कोट्यातील ४३९७, अल्पसंख्याक १० हजार ९३४ आणि व्यवस्थापन कोट्यातील ४ हजार ५५६ जागा रिक्त असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अकरावी प्रवेश संपल्यानंतर काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3av2VMz

Comments
Post a Comment