नागपूर: जिल्ह्यातील रामटेक आणि पाटणसावंगी येथील शाळांत काही विद्यार्थी बाधित आढळले. त्यामुळे पुढील दहा दिवसांसाठी या परिसरातील आठ शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी दिलेत. जिल्ह्यातील करोना संक्रमणाची सद्य:स्थिती बघता पुढील दहा ते पंधरा दिवस जिल्ह्यातील शाळा बंदच ठेवाव्यात, अशी भूमिका जिल्हा परिषदेने घेतली असून, जिल्हाधिकाऱ्यांकडे तसा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभापती भारती पाटील म्हणाल्या, 'जिल्ह्यात पाटणसावंगी आणि रामटेक येथील प्रत्येकी एक अशा एकूण दोन शाळांमधील विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाली आहे. यात एकूण ३५ विद्यार्थी आणि चार शिक्षकांच्या अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या दोन शाळा तसेच खबरदारी म्हणून या शाळांच्या आसपासच्या परिसरातील सहा अशा एकूण आठ शाळा सध्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.' 'विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांचे आरोग्यही तेवढेच महत्त्वाचे आहे. परीक्षांचा काळ जवळ येत असताना तर अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शाळा बंदच ठेवाव्यात, अशी मागणी आम्ही सोमवारी जिल्हा परिषदेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहोत,' असे पाटील यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pBnA64

Comments
Post a Comment