म. टा. प्रतिनिधी, नाशिक नववी आणि दहावी पाठोपाठ पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत असून बुधवारपासून (दि. २७) फक्त इंग्रजी, विज्ञान आणि गणित या तीन तासिका होणार आहेत. ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अध्यापनाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सोमवारी सायंकाळी सॅनिटायजेशन, साफसफाई करत वर्गांची सजावट करण्यात आली. पालकांच्या संमतीनंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असून ऑफलाइनसह ऑनलाइन अध्यापन सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मंजुरी दिल्यानंतर महापालिकेसह खासगी शाळा व्यवस्थापनाने तयारी पूर्ण केली आहे. बुधवारी सकाळी पाचवी ते आठवीच्या वर्गांना सुरुवात होईल. त्यासाठी सोमवारीच स्वच्छतेस शालेय व्यवस्थापनाने सुरुवात केली. बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फलकलेखन आणि सजावट करण्यात आली आहे. करोना संक्रमण रोखण्यासाठीच्या सूचना जागोजागी लावण्यात आल्या आहेत. वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी बसविण्यात येणार असून सुरक्षित अंतराच्या पालनासाठी खुणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, फक्त तीन विषयांच्या अध्यापनास तूर्तास परवानगी दिली आहे. त्यानुसार, महापालिका क्षेत्रात महापालिका व खासगी शाळांमध्ये गणितासाठी ४५७, विज्ञानासाठी ४९३, तर इंग्रजी विषयासाठी ४२६ असे एकूण १ हजार ३७६ शिक्षक आहेत. या शिक्षकांची करोना चाचणी सुरू आहे. अहवाल निगेटिव्ह आलेल्यांनाच अध्यापनाची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे उद्यापासून पाचवी ते आठवीच्या १ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार असून संमतीपत्र नसलेल्यांना ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेता येणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. २९ पर्यंत तपासणी २० जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या विषय शिक्षकांच्या 'आरटीपीसीआर' चाचण्या सुरू आहेत. मात्र, शहरातील कोविड सेंटर कमी केले असून दोनपैकी केवळ एकाच केंद्रावर शिक्षकांच्या तपासण्या सुरू आहेत. त्यामुळे एका दिवसाला फक्त अडीचशे शिक्षकांची चाचणी होत आहे. अनेकांचे 'स्वॅब'चे अहवाल तपासणीसाठी गेलेले नाहीत. एक हजार शिक्षकांची चाचणी पूर्ण झाली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. तूर्तास, बहुतांश शिक्षकांचे करोना चाचणीचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. शालेय तपशील असा... (पाचवी ते आठवी) शाळा : ४०५ मुख्याध्यापक : ४०४ लिपिक : ६५ शिपाई : ४०४ शिक्षक : २ हजार ६०२ विद्यार्थी : १ लाख १० हजार ७७३ विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कुणालाही शाळेच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. तासिका संपल्यानंतर प्रत्येक वर्गाचे निर्जंतुकीकरण होईल. मास्कचा वापर अनिवार्य आहे. पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. - सुनिता धनगर, प्रशासन अधिकारी, मनपा शिक्षण विभाग
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2KMiEgb

Comments
Post a Comment